एक शून्य मी ह्या पुलंच्या पुस्तकातील पुढील विचार आवडला, तो असा - "आमची दुःख समजणारा नेता आहे, असा विश्वास अनुयायांना वाटत नाही, तोपर्यंत त्या नेतृत्वाला काहीच अर्थ नसतो. "
खरयं, आजची राजकीय परिस्थिती बघितली की ह्या वाक्याचा अर्थ कसा लावावा हेच कळत नाही .
पक्ष तर भारंभार आहेत ,स्वतःचाच आत्मगौरव करणारे नेतेही त्या-त्या पक्षांमध्ये आहेत. पण जनतेचा कोणावरही विश्वास नाही.
समाजात असणारे दैनंदिन प्रश्न, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा , तरुणांना नोकऱ्या ह्या बेसिक गरजा पूर्ण होत नाही, त्याबरोबरच कोणतेही सरकार आले तरी ह्या रोजच्या जीवनातील प्रश्नांना उत्तर किंवा तोडगे निघतच नाहीत. सत्ताधीश व विरोधक यांच्यात तुम्ही काय केलं ,आम्ही काय केलं ,हे कोळसे उगाळण्यात वेळ जातो.समाजाच्या प्रश्नांकडे बघणार कोण ?
स्त्रियांवर होणारे अत्याचार, निरपराधांच्या हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न ,बंद पडत असणारे उद्योगधंदे त्यामुळे वाढणारी बेरोजगारी आणि त्यासंबधित न्यायालयात प्रलंबित असणारे खटले अशा विळख्यात सामान्य माणूस अडकलाय , आणि राजकीय स्थिती बघता असं कोणतंही नेतृत्व नाही की, ते आम्हाला आमचं वाटावं !
एकमेकांवर ताशेरे ओढण्यात संसदेतील कार्यकाळ सपंतो .जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्तेची खुर्ची सांभाळण्यातच काम काजाची वर्षे निघून जातात. तळागाळातल्या माणसांचा विकास हा फक्त त्यांच्या निवडणूक जिंकण्यापुरता गोंडस पण फसवा अजेंडा असतो.
"नेमेचि येतो पावसाळा" याप्रमाणे पुन्हा निवडणुकीच्या काळात हेच नेते साम,दाम,दंड,भेद वापरून मतदारांचा बळी घेतात. निवडून कोणीही आले तरी दुःख समजणारा नेता आम्हाला मिळत नाही. आणि दुर्दैव इतकं की, विरोधकही जनतेची बाजू मांडायला तेवढा खंबीर राहिलेला नाही .कधी असंही वाटतं की आपली लोकशाही ही हुकूमशाहीच्या मार्गावर चालली की काय ?
म्हणुनच राजकारणात सर्वासोबत चालणाऱ्या नेत्याची निवड व्हायला हवी..ही अस्थिर व्यवस्था आपण बदलु शकतो.एक सशक्त मतदार म्हणुन...
आजच्या तरुणांकडे ,भावी पिढी घडवण्याची मोठी ताकद आहे.कारण आपला देश हा तरूणांचा देश म्हणुन आेळखला जातो..
No comments:
Post a Comment